Wednesday, 29 July 2015

कधीच नाही जात

   एकदा काही जणांबरोबर देश , समाज ह्या गोष्टींवर चर्चा करत असताना नकळत मुद्दा घसरला तो 'जात' ह्या विषयावर . त्या लोकांच्या मते जात ,पात ,धर्म व पंत असे काही नसते . आजकाल सर्वांना , उपहारगृह , सिनेमागृह आणि इतर सर्व सामाजिक स्थळे इथे प्रवेश मिळतो . निरनिराळ्या जातीची लोक एकत्र बसून भोजन देखील करतात. ट्रेन , बस आणि इतर सार्वजनिक वाहनात अगदी पाठीला पाठ लावून प्रवास करतात. कोणी चालत्या लोकल ट्रेन मधून पडत असेल तर आपसूक हात देतात तिथे जात ह्या गोष्टीचा कोणीच विचार करत नाही . हल्ली बरेच आंतरजातीय विवाह होतात . बहुतेक सर्व लोकांना नोकर्या मिळतात , उपजीविकेचे साधन मिळते , कोणाचा कोणाला विटाळ होत नाही , सगळ्या लोकांना समान अधिकार आहेत . जात आणि जातिभेद असा कोणताच प्रकार उरला नाही आपल्या देशात . हे पुस्तकी वक्तव्य ऐकल्यावर मी इतकंच बोललों महाशय आपल्या मनातून तरी जात गेली आहे का ? भूतलावर जन्माला येताना आपण आपली जात घेवून येतो . आडनावावरून कोण कोणत्या जातीचे आहे ते लगेच कळते . आडनाव हा फार दूरचा विषय आहे इथे माणसाने प्राणी , पशुपक्षी, निर्जीव वस्तू ह्यांना सुद्धा जातीत वर्गीकरण करून ठेवले आहे . एक सोपं उदाहरण आहे आपण घरी कुत्रा पाळतो , त्याच्या वेगवेळ्या जाती असतात जसे  " जर्मन शेपर्ड , दोबर्मन , अल्सेशन" इ परंतु जे रस्त्यावर फिरतात , रानात वनात असतात त्यांना आपण भटके कुत्रे म्हणतो . इथे पाळीव आणि भटके हे दोन्ही कुत्रेच आहेत मग ह्यात जात का ? ह्यातून एक सिद्ध होते मानवाला जात पाडणे ही  जन्मजात जडलेली सवय आहे , पाळीव असो कि भटके असो त्यांना काय माहित आहे त्यांची जात कोणती ?
         जात ही संकल्पना माणूस जे काम करतो किंवा जो व्यवसाय करतो ह्यावर अवलंबून असते , जसे शेती करतो तो शेतकरी किंवा कुणबी , मातीची भांडी बनवणारा कुंभार , केस कापणारा न्हावी , पुजा करणारा पुजारी ह्या प्रकारे यादी वाढत जाते ह्याचा अर्थ जात आणि जातीयवाद हा माणूसच निर्माण करतो. ज्यावेळी माणसाच्या मनातून जात नाहीसी होईल तेव्हा ती समाजातून नाहीसी होईल . जात ही माणसाचा मरेपर्यंत पिच्छा सोडत नाही. शाळेत गेल्यावर आपल्याला जात म्हणजे काय ते समजते कारण ती शाळेच्या दाखल्यावर चिकटलेली असते . पुढे कॉलेज ला गेल्यापासून ते आयुष्यभर ती आपल्यासोबत असते . बहुतेक लग्नविषयक जाहिरातीमध्ये हेच नमूद केलेले असते वधू किंवा वर पाहिजे स्वजातीय असावा . शिक्षणाने माणूस हुशार होतो पण शहाणा होत नाही . जात हा प्रकार समाजातून घालवण्यासाठी माणसाने शहाणे असायला हवे .
        जातीबरोबर लोकांना जातीवरून संबोधने  जोडली जातात . काही लोकांना ती संबोधने जोडून घेणे मोठेपणाचे वाटते. काही तमाशा कलावंत त्यांच्या कार्यक्रमाच्या जाहिरातीत स्वजातीचा उल्लेख करत असत . कचरू , दगडू , गणपा इ अशी नावे जातीनुसार ठेवली जात आणि आजही ग्रामीण भागात लोकांना प्रथम नाव आणि जात ह्याने संबोधले जाते . काही लोक शिकली आहेत ती आपले नाव आणि वडिलांचे नाव ह्याची फक्त अद्याक्षरे वापरतात आणि आडनाव लिहतात . काहीजण आडनाव सुध्धा बदलून टाकतात . इतका सगळा बदल करून सुद्धा जातीचा पगडा कायम असतो , शिक्षण , सरकारी नोकरी इथे जातीचे आरक्षण असते . जातीचे आरक्षण हे समाजाचा स्तर समान व्हवा ह्यासाठी असते . त्याचा कित्येकजण उपयोग करतात आणि दुरुपयोग करतात ते त्यांनाच ठावूक . आपल्या देशात लोकशाही असून सुद्धा निवडणूक काळात बरीच मते ही जातीवर विभागली जातात . जातीचे राजकारण केले जाते. जातीवरून लोकांच्या भावना भडकावल्या जातात आणि एवढे सगळे करूनही शेवटी काहीच साध्य होत नाही .
      जातीयता ही मानवाची मानवाकडून गळाचेपी करत आहे . आणि मानवाला विकासापासून दूर लोटत आहे. परिणामी जनमनात विषमता पसरत आहे . मानवता हा सर्वात मोठा धर्म आहे व माणुसकी हि सर्वात मोठी जात आहे . जात ह्या विषयावर खूप जणांनी खूप काही लिहले , खूप प्रोबोधन केले , नाटक , सिनेमे पण निघाले खूप चळवळी झाल्या . काहीना यश आले , आजही जात ह्या विषयावर संघर्ष चालू आहे . लोकांची मानसिकता बदलणे अनिवार्य आहे यथावकाश प्रयत्नांना यश येईल . सर्व समाज गुण्यागोविंद्याने राहील . माणूस माणसाला मनापासून माणूस म्हणेल . समता आणि बंधुता नांदेल . तूर्त हे कटू सत्य पचवावे लागेल ' जी कधीच जात नाही ती जात ' 

© सागर शिंदे (सिंधिया)
चित्र सौजन्य : गुगल


No comments:

Post a Comment